‘स्वतःचं घर-पक्ष सांभाळता येत नाही, ते राज्य-देश काय सांभाळणार?’; खासदार वाघमारे यांचा ठाकरे गटावर निशाणा
नांदेड : राज्यसभा खासदार ज्योती वाघमारे यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटावर जोरदार टीका केली आहे. नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी एबीपी माझाशी बोलताना उद्धव ठाकरे यांच्यापासून ते पक्षातील अंतर्गत वादापर्यंत अनेक मुद्द्यांवर बोचरे बोल केले. विशेषतः एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना ‘साहेब’ म्हणत महाराष्ट्राची संस्कृती जपली, मात्र उद्धव ठाकरे यांनी निरोप समारंभाचा आरोप केल्याचे सांगत वाघमारे यांनी त्यांच्यावर निशाणा साधला.
‘स्वतःचं घर-पक्ष सांभाळता येत नाही, राज्य काय सांभाळणार?’
ज्योती वाघमारे म्हणाल्या, “ज्या माणसाला स्वतःचं घर सांभाळता येत नाही, पक्ष सांभाळता येत नाही, ते लोक राज्य काय सांभाळणार आणि राष्ट्र काय सांभाळणार? त्यांचा भाऊ त्यांना सोडून गेला, चुलत भावाला पक्ष सोडून बाहेर जावं लागलं. अशा परिस्थितीतही खिंड लढवणाऱ्या संजय राऊत यांची कॉलर युवराज धरत आहेत, प्रियंका चतुर्वेदी संताप करत आहेत.”
‘एकनाथ शिंदे यांचं मन मोठं, उद्धव ठाकरेंनी नातवालाही सोडलं नाही’
वाघमारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक करताना उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले. त्या म्हणाल्या, “एकनाथ शिंदे यांचं मन खूप मोठं आहे. त्यांच्यावर कष्टकरी आई-वडिलांचे संस्कार आहेत. मुख्यमंत्री झाले तरी ते स्वतःला कॉमन मॅन म्हणतात. महाराष्ट्राची संस्कृती दाखवत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना ‘साहेब’ म्हटलं. पण उद्धव ठाकरे यांनी तर एकनाथ शिंदे यांच्या नातवालाही सोडलं नाही. त्यांनी निरोप समारंभाचा आरोप समारंभ केला. उद्धव ठाकरे यांनी आत्मपरीक्षण करावं आणि बाळासाहेब ठाकरे व प्रबोधनकार ठाकरे यांच्या संस्कारांना जपण्यासारखं वागावं.”
लोकसभेचे ठाकरे गटाचे खासदारही शिंदेंचं कौतुक करत आहेत’
शिवसेना उद्धव ठाकरे गटाला सल्ला देताना वाघमारे म्हणाल्या, “लोकसभेचे ठाकरे गटाचे खासदार हे एकनाथ शिंदे यांचे कौतुक करत आहेत. त्यामुळे आता तरी तुम्ही शहाणं व्हा.” तसेच ठाकरे गटातील अंतर्गत वादावर भाष्य करताना त्या म्हणाल्या, “प्रियंका चतुर्वेदी यांचे शिवसेनेमध्ये काय योगदान आहे? अरविंद सावंत, चंद्रकांत खैरेंची जागा प्रियंका चतुर्वेदीला दिली होती. ठाकरे गटात सर्व काही अलबेल नाही. ४० आमदार तुमच्या नाकाखालून गेले. त्यांचा पक्ष हा विषम वादातून फुटेल.”
‘कायद्याचे राज्य आहे, भोंदू बाबाला सोडलं नाही’
रूपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यावर बोलताना वाघमारे म्हणाल्या की, “रूपाली चाकणकर यांनी राजीनामा दिलेला आहे, हे मला तुमच्या माध्यमातूनच कळते. कोण दोषी, कोण आरोपी हा निर्णय पोलीस यंत्रणा घेईल. राज्य कायद्याने आणि संविधानाने चालते. भोंदू बाबाला परदेशी पळून जाऊ दिले नाही. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट सांगितलं की कोणालाच पाठीशी घालणार नाही.”
पुढील काळात महिलांसाठी शक्ती कायद्यासारखा प्रभावी कायदा व्हावा, यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही वाघमारे यांनी स्पष्ट केले.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.