तेलंगणात स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी मतपत्रिकेवर मतदानात काँग्रेसची त्सुनामी; भाजप, बीआरएस अन् एमआयएला धोबीपछाड, राहुल गांधी म्हणाले..
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले की, निकाल हे सामाजिक न्याय, आदर आणि समावेशक विकासाच्या दृष्टिकोनाला जनतेचा पाठिंबा स्पष्टपणे दर्शवितात.
तेलंगणात 123 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मतपत्रिकेवर पार पडल्या. या निवडणुकीत काँग्रेसने विरोधकांचा धुव्वा उडवत एकहाती यश मिळवलं. 13 फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या या निवडणुकांमध्ये एकूण 2,996 वॉर्डांपैकी 2,995 वॉर्डांचे निकाल जाहीर झाले आणि बहुमतासाठी आवश्यक असलेल्या 1498 जागांच्या पुढे जात काँग्रेसने 1537 जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले. टक्केवारीत बोलायचे तर 51.3 टक्के जागांवर विजय मिळवत काँग्रेसने नागरी पातळीवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. सत्ताधारी काँग्रेसविरुद्ध नाराजी आहे, असा दावा करणाऱ्या विरोधकांना मतदारांनी फारसा प्रतिसाद दिलेला दिसत नाही. भारत राष्ट्र समिती (BRS) 781 जागांसह दुसऱ्या क्रमांकावर राहिली, तर भारतीय जनता पक्षला केवळ 336 जागांवर समाधान मानावे लागले.
महिलांचे वर्चस्व आणि सामाजिक समतोल
शहरी भागात आपला प्रभाव टिकवून ठेवणाऱ्या ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) ने 70 जागा जिंकल्या. अपक्ष उमेदवारांनी 183 जागा जिंकल्या. CPI(M) ला 13 आणि BSP ला 2 जागा मिळाल्या, तर TDP आणि जनसेना पक्षाला एकही जागा जिंकता आली नाही. या निवडणुकीतील सर्वात लक्षणीय बाब म्हणजे महिलांचे वाढते प्रतिनिधित्व. एकूण 1638 महिला निवडून आल्या, तर पुरुषांची संख्या 1356 राहिली. सामाजिक प्रवर्गांच्या दृष्टीने पाहता, मागासवर्गीय समुदायात सर्वाधिक 1661 प्रतिनिधींनी विजय मिळवला. निवडून आलेल्या प्रतिनिधींच्या शैक्षणिक पार्श्वभूमीवर नजर टाकली असता, 41.9 टक्के सदस्य पदवीपूर्व शिक्षण घेतलेले आहेत. 15.9 टक्के पदवीधर आणि 6.5 टक्के पदव्युत्तर शिक्षित आहेत. चार सदस्य डॉक्टरेट धारक आहेत.
राहुल गांधी काय म्हणाले?
दुसरीकडे, तेलंगणा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या प्रचंड विजयाबद्दल राज्य सरकारच्या जनहितकारी धोरणांचे प्रमाणीकरण असल्याचे वर्णन केले आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले की, निकाल हे सामाजिक न्याय, आदर आणि समावेशक विकासाच्या दृष्टिकोनाला जनतेचा पाठिंबा स्पष्टपणे दर्शवितात. त्यांनी सांगितले की, हा विजय जनतेच्या विश्वासाचा थेट पुरावा आहे. राहुल गांधी यांनी निवडणूक निकालांनंतर एक निवेदन जारी केले, ज्यामध्ये ते म्हणाले की, तेलंगणा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधील विजय हा काँग्रेस सरकारच्या लोकप्रिय धोरणांचे प्रमाणीकरण आहे. त्यांनी म्हटले की, पक्षाचे ध्येय प्रजाला तेलंगणा निर्माण करणे आहे, जिथे विकासाचे फायदे प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचतील. राहुल गांधी यांनी काँग्रेस कार्यकर्ते आणि नेत्यांचे आभार मानत म्हटले की, हा विजय तळागाळातील कार्यकर्त्यांचा आणि राज्यातील जनतेचा आहे.
रेवंत रेड्डी सरकारला बळकटी
हे निकाल ए. रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारसाठी एक मोठी राजकीय चालना मानली जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे अनेकदा सरकारच्या कामगिरीवर थेट जनमत म्हणून पाहिले जाते. काँग्रेसचा हा प्रचंड विजय शहरी आणि स्थानिक पातळीवर पक्षाचा पाया मजबूत होत असल्याचे दर्शवितो. बसपा आणि भाजपनेही अनेक ठिकाणी विजय मिळवला, परंतु एकूण आघाडी काँग्रेसच्या बाजूने राहिली.
हा जनतेच्या विश्वासाचा जनादेश
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही निकालांवर प्रतिक्रिया व्यक्त केली आणि हा जनतेच्या विश्वासाचा जनादेश असल्याचे म्हटले. खरगे म्हणाले की तेलंगणातील जनतेने सामाजिक न्याय, आर्थिक सक्षमीकरण आणि सतत प्रगतीच्या अजेंड्यावर विश्वास ठेवला आहे. त्यांनी राज्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले आणि पक्ष आपल्या आश्वासनांवर ठामपणे पुढे जाईल असे सांगितले.

Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.