⚡ ब्रेकिंग News

पुण्यात जोरदार पाऊस, पिंपरी-चिंचवडलाही सरींनी झोडपलं; हवामान खात्याकडून राज्यात गारपिटीचा अंदाज


बाणेर, शिवाजीनगरसह विविध भागात पाणी साचले; वाशिममध्ये अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढवली, १ एप्रिलपासून वाढणार पावसाची तीव्रता

पुणे : राज्याच्या विविध भागात हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि विदर्भातील वाशिम जिल्ह्यात दुपारी अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. या पावसामुळे वातावरणात काही काळ गारवा निर्माण झाला असला, तरी शेती पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

पुणे-पिंपरीत पावसाची बॅटिंग

पुणे शहरात सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. दुपारच्या सुमारास बाणेर, शिवाजीनगर, पुणे स्टेशन, हडपसर आणि लोणी काळभोर परिसरात पावसाने जोरदार बॅटिंग केली. बाणेर भागात पावसाचा जोर अधिक असल्याने सखल भागात पाणी साचले होते. पिंपरी-चिंचवड शहरातही पावसाने अर्धा तास अक्षरशः झोडपून काढले. सकाळपासून सूर्य आणि ढगांचा लपंडाव सुरू होता, मात्र दुपारी अचानक आलेल्या पावसामुळे कामावर निघालेल्या चाकरमान्यांची आणि पादचाऱ्यांची चांगलीच धावपळ झाली.

वाशिममध्ये पिकांचे नुकसान; शेतकरी चिंतेत

विदर्भातील वाशिम जिल्ह्यातही अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. विशेषतः रिसोड तालुक्यातील काही भागात पावसाच्या सरी कोसळल्या. अवेळी आलेल्या या पावसामुळे शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. या पावसामुळे बीजवाई कांदा, आंबा, फळबागा आणि भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कापणीला आलेल्या पिकांना या पावसाचा मोठा फटका बसणार असल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे.

हवामान विभागाचा अंदाज : गारपिटीची शक्यता

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, ३० मार्च ते ४ एप्रिलदरम्यान राज्यातील हवामानात लक्षणीय बदल होण्याची शक्यता आहे. खानदेश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात दुपारनंतर मेघगर्जनेसह पाऊस, ताशी ३० ते ५० किमी वेगाने जोरदार वादळी वारे आणि काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे, १ एप्रिलपासून पावसाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, तसेच नागरिकांनी प्रवासादरम्यान सतर्क राहावे, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे. हवामान खात्याने पुढील दोन-तीन दिवस पावसाचा अंदाज वर्तवला असून, आजच्या पावसानंतर उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, शेतीपिकांवर होणाऱ्या परिणामामुळे शेतकरी वर्ग चिंतेत आहे.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...