"विरोधकांना हलक्यात घेऊ नका"; गैरहजर आमदार-मंत्र्यांचे रवींद्र चव्हाण यांनी कान टोचले, हातात रिपोर्ट कार्ड ठेवून केला सवाल
विधीमंडळातील दांडीबहाद्दरांवर भाजपची करडी नजर; आता अनुपस्थितीसाठी लेखी कारण देणे बंधनकारक
मुंबई : विधीमंडळाच्या कामकाजात सातत्याने गैरहजर राहणाऱ्या भाजपच्या आमदार आणि मंत्र्यांचे आता पक्षाकडून कान टोचले जाणार आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सर्व आमदार व मंत्र्यांची विशेष बैठक घेऊन त्यांच्या कामगिरीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी सभागृहातील अनुपस्थितीबाबत नाराजी व्यक्त करत कठोर भूमिका घेतल्याची माहिती समोर आली आहे.
रवींद्र चव्हाण यांनी आमदारांना स्पष्ट सूचना दिल्या की, "विरोधकांना हलक्यात घेऊन हवेत राहू नका. विधीमंडळातील कामकाज गांभीर्याने घ्या." यापुढे सकाळपासून सभागृह सुरू होताच ते संपेपर्यंत सर्व आमदार व मंत्र्यांनी उपस्थित राहणे बंधनकारक असल्याचे त्यांनी सांगितले. बैठकीतच सर्वांच्या हातात रिपोर्ट कार्ड ठेवत त्यांनी कोण किती वेळ सभागृहात होता, याची प्रचिती दिली.
पक्षाने यासाठी नवी यंत्रणा तयार केली आहे. त्यानुसार, पाच आमदारांचा एक गट तयार करण्यात आला असून, या गटातील एका आमदाराकडे संपूर्ण गटाच्या उपस्थितीची जबाबदारी देण्यात आली आहे. हा आमदार आपल्या गटातील सर्वांच्या उपस्थितीचा रिपोर्ट प्रदेशाध्यक्षांना सादर करेल. तर मंत्र्यांच्या उपस्थितीवर संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील लक्ष ठेवणार आहेत.
यापुढे कोणत्याही आमदाराला किंवा मंत्र्याला विधीमंडळातून गैरहजर राहायचे असल्यास त्यासाठी लेखी कारण पक्षाला कळवावे लागणार आहे. जर कोणी महत्त्वाच्या कामासाठी अनुपस्थित असेल तर त्याचे संयुक्तिक कारण लेखी स्वरूपात देणे अनिवार्य असेल. मात्र, कोणतेही कारण न देता विनाकारण गैरहजर राहणाऱ्या आमदारावर पक्षाकडून कारवाई करण्यात येईल, तर मंत्र्यांवर संसदीय कामकाज मंत्र्यांकडून कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. या निर्णयामुळे भाजपच्या आमदार-मंत्र्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.