युद्धविरामासाठी पुढाकार घ्यावाच; अण्णा हजारेंचं पंतप्रधान मोदींना पत्र
‘शस्त्र नव्हे, संवाद हवा’, जागतिक तणावादरम्यान भारताच्या भूमिकेवर भर
अहिल्यानगर : जगातील वाढत्या भू-राजकीय तणाव आणि युद्धामुळे होणाऱ्या नागरी हानीबद्दल चिंता व्यक्त करताना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. युद्ध थांबवून शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर तटस्थ पण जबाबदार नेतृत्व करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील चढत्या तणावामुळे संपूर्ण जग चिंतेत आहे. या संघर्षात हजारो नागरिकांचा मृत्यू झाला असून महिला आणि मुलांवर होणारे परिणाम अत्यंत वेदनादायी असल्याचे अण्णा हजारे यांनी नमूद केले आहे. पंतप्रधान मोदींनी आखाती देशात अडकलेल्या भारतीयांच्या सुरक्षेसाठी केलेले प्रयत्न महत्त्वाचे असले तरी, आता जागतिक स्तरावर शांततेसाठी पुढाकार घेण्याची वेळ आल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
भारताची अहिंसक परंपरा
अण्णा हजारे यांनी पत्रात म्हटले आहे की, भारताची संस्कृती आणि परंपरा नेहमीच अहिंसा आणि शांततेची राहिली आहे. महात्मा गांधींनी संपूर्ण जगाला संवाद आणि सत्याग्रहाचा मार्ग दाखवला. त्याच परंपरेचा वारसा पुढे नेत भारताने जगासमोर शांततेचे मॉडेल ठेवायला हवे. "युद्धामुळे फक्त विनाश होतो; संवादातूनच स्थैर्य, विश्वास आणि समाधानाचा मार्ग निघतो," असे स्पष्ट मत त्यांनी पत्रात नोंदवले आहे.
तटस्थ भूमिकेतून नेतृत्व
"भारतासारख्या मोठ्या लोकशाही राष्ट्राने या संघर्षात केवळ बघ्याची भूमिका घेऊ नये, तर तटस्थ राहून मानवतेच्या बाजूने उभे राहिले पाहिजे," अशी अपेक्षा अण्णांनी व्यक्त केली. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारताने आतापर्यंत अनेक जागतिक प्रश्नांवर सकारात्मक भूमिका बजावली आहे. त्यामुळे या संवेदनशील काळात जगाला शस्त्रसंघर्षातून बाहेर काढून संवादाच्या चौकटीत आणण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी विनंतीही त्यांनी या पत्रातून केली आहे.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.