पहिल्यांदाच अंतिम फेरीत, पहिल्याच प्रयत्नात विजेतेपद; ५८४ धावांच्या डोंगरासमोर कर्नाटकचा डाव २९३ वर आटोपला, औकिब नबीची भेदक गोलंदाजी ठरली निर्णायक
क्रांती न्यूज वृत्तांत:
भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये आज (२८ फेब्रुवारी) एका नव्या युगाची सुरुवात झाली. रणजी ट्रॉफी २०२५-२६ च्या अंतिम सामन्यात जम्मू आणि काश्मीरने बलाढ्य कर्नाटक संघाला पराभूत करत पहिल्यांदाच रणजी चषक आपल्या नावे केला. विशेष म्हणजे, रणजी ट्रॉफीच्या अंतिम फेरीत पोहोचण्याचीही ही जम्मू-काश्मीरची पहिलीच वेळ होती आणि पहिल्याच प्रयत्नात त्यांनी विजेतेपदावर आपलं नाव कोरलं.
नियमाने मिळवला विजय:
कसोटी क्रिकेटप्रमाणे रणजी ट्रॉफीचा अंतिम सामना पाच दिवस खेळवला जातो. पाचव्या दिवसअखेर निकाल न लागल्यास, पहिल्या डावात आघाडी घेणाऱ्या संघाला विजेता घोषित केले जाते. यंदाच्या अंतिम सामन्यात नेमकं हेच घडलं. पहिल्या डावात प्रचंड आघाडी घेतल्याने, सामना अनिर्णित राहिला तरी नियमानुसार जम्मू-काश्मीर संघाला विजयी घोषित करण्यात आलं.
पहिल्या डावात उभारला ५८४ धावांचा डोंगर:
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना जम्मू-काश्मीरने पहिल्या डावात ५८४ धावांचा डोंगर उभारला. दुसऱ्या विकेटसाठी शुभम पुंडीर आणि यावर हसन यांनी १३९ धावांची भागीदारी केली. यावर ८८ धावांवर बाद झाला, पण शुभमने अब्दुल समदसोबत चौथ्या विकेटसाठी १२४ धावा जोडल्या. शुभम पुंडीरने १४ चौकारांसह १२१ धावांची शतकी खेळी केली, तर अब्दुल समदने ६१ धावा केल्या. कर्णधार पारस डोगराने ७० तर साहिल लोत्राने ७२ धावांचं योगदान दिलं. कर्नाटककडून प्रसिद्ध कृष्णाने ५ विकेट घेतल्या.
औकिब नबीची करामत, कर्नाटकचा डाव २९३ वर गारद:
प्रचंड धावसंख्येच्या आव्हानाचा पाठलाग करताना कर्नाटकची सुरुवात अत्यंत खराब झाली. जम्मू-काश्मीरचा वेगवान गोलंदाज औकिब नबीने कर्नाटकच्या वरच्या फळीला हादरवून सोडलं. केएल राहुल (१३), करुण नायर (०) आणि स्मरण आर (०) यांना माघारी धाडत त्याने कर्नाटकची कंबर मोडली.
कर्णधार मयंक अग्रवालने एक बाजू लावून धरत शानदार शतक झळकावलं (१६० धावा), पण औकिबनं त्यालाही माघारी धाडलं. २३ षटकांत ७ निर्धाव षटकांसह ५४ धावांत ५ बळी घेत औकिब नबीने संघाला सामन्यात पुनरागमन करून दिलं. सुनील कुमारने देवदत्त पडिक्कलचा बळी घेतल्यानंतर कर्नाटकचा संपूर्ण डाव २९३ धावांवर आटोपला. पहिल्या डावात जम्मू-काश्मीरने २९१ धावांची प्रचंड आघाडी घेतली.
दुसऱ्या डावात कामरान आणि साहिलची शतके:
पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर फॉलोऑन न देता जम्मू-काश्मीरने पुन्हा फलंदाजी केली. दुसऱ्या डावात कामरान इक्बाल आणि साहिल लोत्रा यांनी नाबाद शतके झळकावली. कामरानने नाबाद १६० तर साहिलने नाबाद १०१ धावा केल्या. पाचव्या दिवशी दुपारच्या जेवणानंतर कर्णधार पारस डोगराने डाव घोषित केला आणि जम्मू-काश्मीर संघाला ऐतिहासिक विजेतेपद मिळालं.
जम्मू-काश्मीरसाठी हा केवळ क्रिकेटचा विजय नसून, संघर्ष आणि समर्पणाचा आदर्श ठरावा असा पराक्रम आहे.
.jpg)
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.