जलकुंभ उभारला, ५०० घरांना नळ जोडले... पण तीन वर्षांपासून पाण्याचा एक थेंबही नाही! भंडाऱ्याच्या हरदोलीत जलजीवन मिशनचा कोट्यवधींचा ‘शो-पीस’
‘नळ आले, पण जल गेलं’ तुमसर तालुक्यातील हरदोली-सिहोरा गावात महिलांना आजही डोक्यावर हंडे घेऊन वणवण; २८ लाखांचा अतिरिक्त निधी मंजूर, तरीही पाणी येत नाही!
भंडारा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी जलजीवन मिशन (हर घर नल, हर घर जल) अंतर्गत भंडारा जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला. पण तुमसर तालुक्यातील हरदोली-सिहोरा या अडीच हजार लोकसंख्येच्या गावात ही योजना पूर्णपणे फोल ठरली आहे.
गावात मोठा जलकुंभ (पाण्याची टाकी) बांधण्यात आला, सुमारे ५०० घरांना नळ जोडणीही करण्यात आली. मात्र गेल्या तीन वर्षांपासून या नळांमधून पाण्याचा एक थेंबही आलेला नाही.
ग्रामस्थांची व्यथा:
घरासमोर नळ आहेत, पण त्यात पाणी नाही.
आजही महिलांना विहिरीवर आणि हातपंपावर रांगा लावाव्या लागतात.
तांत्रिक दोष आणि प्रशासकीय अनास्थेमुळे संपूर्ण योजना धूळ खात पडली आहे.
आता पुन्हा २८ लाख रुपयांचा वाढीव निधी मंजूर करण्यात आला आहे. यामुळे जनतेच्या पैशांची निव्वळ उधळपट्टी होत असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत.
जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता हितेश खोब्रागडे यांना या प्रकरणाबाबत विचारणा केली असता, त्यांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास स्पष्ट नकार दिला.
ग्रामस्थांचा सवाल आहे
“नळ लावून तीन वर्ष झाली, पण पाणी कधीच पाहिलं नाही. फक्त पाईप लावून काय उपयोग? चुकीच्या नियोजनाला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई होणार की, हा नवीन निधीही वाया जाणार?”
हरदोली-सिहोरा गावात जलजीवन मिशनची ‘शो-पीस’ योजना बनली असून, तहानलेल्या ग्रामस्थांना न्याय कधी मिळणार, हे आता पाहणं महत्त्वाचं ठरेल.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.