अजितदादांच्या विमान अपघातप्रकरणी युगेंद्र पवारांचा मोठा दावा; "घटनास्थळी मोठी झाडं नाहीत, फक्त लहान झुडपं!"
डीजीसीए अहवालातील चूक समोर आणत म्हणाले- "कंपनी मालकावर कारवाई व्हावी"; चौकशीत अनेक प्रश्न अनुत्तरीत असल्याचा आरोप
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाती मृत्यूप्रकरणी आता नवा वाद निर्माण झाला आहे. अजित पवारांचे पुतणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे नेते युगेंद्र पवार यांनी डीजीसीएच्या अहवालातील एक मोठी चूक समोर आणली आहे. घटनास्थळी मोठी झाडं नसून फक्त लहान झुडपं असल्याचा दावा करत त्यांनी अहवालावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
युगेंद्र पवार काय म्हणाले?
युगेंद्र पवार म्हणाले, "मी घटनास्थळी सुरुवातीला पोहोचलो होतो. ज्या ठिकाणी विमान कोसळलं तो भाग दुष्काळी आहे. तिथे पाण्याचा प्रश्न आहे. आजही त्या ठिकाणी मोठी झाडी दिसणार नाही, जी आहे ती अगदी छोटी लहान झुडपं आहेत. प्राथमिक अहवालाचं स्वागत आहे पण खूप काही गोष्टी आहेत, खूप काही प्रश्न राहिले आहेत ज्यांना उत्तर मिळालेलं नाही."
फक्त लिएर जेट नव्हे तर सर्व विमानं ग्राउंड करावीत
पुढे बोलताना युगेंद्र पवार म्हणाले, "फक्त लिएर जेटच नव्हे तर त्या कंपनीची सर्व विमानं ग्राउंड करावीत. कंपनीच्या मालकावर आणि संचालकांवर कारवाई झाली पाहिजे. लवकरात लवकर चौकशी पार पाडावी, अशी आमची सर्वांची मागणी आहे."
सीआयडी तपासावरही प्रश्न
युगेंद्र पवार यांनी सीआयडीच्या तपासावरही नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, "सीआयडीच्या तपासाला एक महिना होऊन गेला. खूप आधी चौकशीसाठी त्यांना बोलवायला हवं होतं. आमच्यासमोर जे पुरावे येत आहेत, ते आम्ही सर्वांसमोर आणण्याचा प्रयत्न करत आहोत आणि त्यात यश मिळेल असं वाटतं."
शरद पवार-पार्थ पवारांच्या राज्यसभा निवडणुकीबद्दल काय म्हणाले?
शरद पवार आणि पार्थ पवार यांच्या राज्यसभा निवडणुकीबद्दल बोलताना युगेंद्र पवार म्हणाले, "सर्वात जास्त अनुभव शरद पवार यांच्याकडे आहे. साठ वर्षं त्यांची राजकारणात पूर्ण झाली आहेत. देशाला अशा नेतृत्वाची गरज आहे. महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांचे मनापासून आभार. सर्वांनी पवार साहेबांना पाठिंबा दिला आहे."
बारामतीच्या पाणीप्रश्नाबाबत काय म्हणाले?
उन्हाळ्यात बारामतीत निर्माण होणाऱ्या पाणीप्रश्नाबाबत युगेंद्र पवार म्हणाले, "३२ गावं अशी आहेत जिथे व्यवस्थित पाणी मिळत नाही. मार्चपासूनच पाण्याचं नियोजन करायचा प्रयत्न करत आहोत. पूर्वी बारामतीचं हक्काचं पाणी मिळत होतं, दादा पालकमंत्री होते. आता आपल्या सर्वांना एकत्र येऊन काम करावं लागेल. जिराईत भागाला उन्हाळ्यात पाणी कमी पडू दिलं नाही पाहिजे. चाऱ्याचा प्रश्न सोडवावा लागेल."
पुढे बोलताना ते म्हणाले, "जनाई शिरसाई उपसा सिंचन योजना, नाझरे धरण यांची पाहणी करून शेतकऱ्यांसाठी पुन्हा काम करू. दादांसारखे दूरदृष्टीचे नेते आज आपल्यात राहिले नाहीत. बारामतीच्या हक्काचं सर्व पाणी आणण्याची जबाबदारी आता सर्वसामान्य नागरिकांची आहे."
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.