अपूर्ण कामांमुळे ३० हून अधिक बळी; मागण्या मान्य न झाल्यास १ एप्रिलपासून म्हसवड पोलीस ठाण्यासमोर आमरण उपोषण
म्हसवड, क्रांती न्यूज (प्रतिनिधी): सातारा–पंढरपूर मार्गावरील धुळदेव परिसरात वारंवार होणाऱ्या भीषण अपघातांनी आता जनसामान्यांच्या संयमाचा अंत पाहिला आहे. या जीवघेण्या निष्काळजीपणासाठी संबंधित विभाग आणि ठेकेदारावर थेट 'मनुष्यवधाचा' गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी म्हसवडमधील स्थानिक पत्रकारांनी प्रशासनाविरुद्ध एल्गार पुकारला असून १ एप्रिलपासून आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.
आज सकाळी धुळदेव परिसरात झालेल्या अपघातात दोन निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे. गेल्या ८ वर्षांपासून म्हसवड-आण नदी पूल, दिवड-करंज ओढा पूल आणि धुळदेव ओढा पूल ही कामे रेंगाळलेली आहेत. ही अपूर्ण कामेच नागरिकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरत असल्याचा गंभीर आरोप पत्रकारांनी म्हसवड पोलीस ठाण्यात दिलेल्या निवेदनात केला आहे.
हे अपघात नव्हे, तर सरकारी हलगर्जीपणा! निवेदनात नमूद केल्यानुसार, या मार्गावरील धोकादायक स्थितीबाबत प्रशासन आणि ठेकेदाराला वारंवार सूचना देऊनही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले. आतापर्यंत या परिसरात ३० हून अधिक लोकांचा बळी गेला आहे. त्यामुळे हे केवळ 'अपघात' नसून प्रशासकीय निष्काळजीपणामुळे घडलेले मृत्यू आहेत, असे पत्रात म्हटले आहे.
संबंधित ठेकेदार आणि बांधकाम कंपनीवर तातडीने कलम ३०४ (मनुष्यवध) अंतर्गत गुन्हा दाखल करावा.
अपूर्ण रस्ते आणि पुलांची कामे युद्धपातळीवर पूर्ण करावीत.
दोषी अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून कठोर कारवाई व्हावी.
भविष्यातील जीवितहानी टाळण्यासाठी तातडीने सुरक्षा उपाययोजना कराव्यात.
प्रशासनाने या मागण्यांकडे गांभीर्याने न बघितल्यास, १ एप्रिल २०२६ रोजी म्हसवड पोलीस स्टेशनसमोर पत्रकार उपोषणाला बसणार आहेत. या निवेदनावर सल्लाउद्दिन चोपदार (दै. सकाळ), पोपट बनसोडे (दै. पुढारी), सचिन शिंगाडे (माणदेश प्राईम), शहाजी लोखंडे (दै. बाळकडू), अहमद मुल्ला (दै. लोकमंथन) आणि एल. के. सरतापे यांच्या सह्या आहेत.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.