'जन्माच्या १४ वर्ष आधीच हिबानामा', दानवेंकडून सीआयडी चौकशीची मागणी; भुमरे म्हणाले, "आरोप सिद्ध करा"
छत्रपती संभाजीनगर - क्रांती न्यूज : उद्धव ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी शिंदे गटाचे खासदार संदीपान भुमरे यांच्यावर समृद्धी महामार्गाशी संबंधित ११५० कोटी रुपयांच्या जमीन घोटाळ्याचा गंभीर आरोप केला आहे. याप्रकरणी दानवेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहित सीआयडी चौकशीची मागणी केली आहे.
नेमका आरोप काय?
दानवेंच्या आरोपानुसार, समृद्धी महामार्गासाठी जटवाडा परिसरातील २३ एकर ३० गुंठे जमीन महाराष्ट्र विकास मंडळाने संपादित केली. या जमिनीचे संपादन मूल्य तब्बल ११५० कोटी रुपये निश्चित करण्यात आले होते. मात्र, ही जमीन बळकावण्यासाठी भुमरे यांनी आपले ड्रायव्हर जावेद रसूल शेख याच्या नावे 'हिबानामा' (बक्षीसपत्र) करून घेतल्याचा आरोप दानवेंनी केला आहे.
जन्मापूर्वीचा हिबानामा?
दानवे यांनी केलेल्या दाव्यानुसार, हा हिबानामा १९७१ साली झाल्याचे दाखवण्यात आले आहे. मात्र, जावेद रसूल शेखचा जन्म १९८५ मध्ये झाला आहे. त्यामुळे जन्माच्या १४ वर्ष आधी त्याच्या नावे हिबानामा कसा झाला, असा सवाल दानवेंनी उपस्थित केला आहे. मोठ्या प्रमाणात मोबदला मिळवण्यासाठी ही कागदपत्रे बनावट असल्याचा आरोप त्यांनी केला.
भुमरे यांचा प्रतिकार
दरम्यान, खासदार संदीपान भुमरे यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. "जावेद रसूल हा माझा ड्रायव्हर आहे, पण त्याचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. माझ्यावर जो आरोप करण्यात आला आहे तो चुकीचा असून असा कोणताही हिबानामा झालेला नाही. आरोप करण्यात आलेला जावेद हा दुसराच व्यक्ती असू शकतो. अंबादास दानवे यांनी त्यांचे आरोप सिद्ध करून दाखवावेत," असे भुमरे म्हणाले. दानवेंच्या आरोपामुळे छत्रपती संभाजीनगरच्या राजकारणात नवा तणाव निर्माण झाला आहे.
.jpg)
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.